मुंबई : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये ससत दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेक जवान शहीद झाले आहेत. यामुळे या प्रकरणांची जबाबदारी घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केली आहे.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, अमित शहा पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत. देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे गृहमंत्र्यांचे लक्ष नाही. यामुळे अमित शहा अयशस्वी गृहमंत्री आहेत. असा दावाही राऊतांनी केला.ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्याच दिवशी काश्मीरमध्ये सर्वांत मोठा हल्ला झाला.
तीच विटी आणि तोच दांडू. तेच गृहमंत्री, जे आधी पाच वर्षे पूर्णपणे अपयशी ठरले. तेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ज्यांच्याकडून काहीच ठोस काही झाले नाही. अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये धुमाकूळ घातला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून हात चोळत बसले आहेत. असा टोलाही त्यांनी शहांना लगावला.