लखनौ : देशभरात आतापर्यंत लोकसभा निवडणुकांच्या चार टप्प्यांतील निवडणुका झाल्या आहेत. या चार टप्प्यांत इंडिया आघाडी मजबूत स्थितीत असून, जनतेने नरेंद्र मोदींना निरोप देण्याचे ठरवले आहे, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. खरगे यांनी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही निवडणूक विचारधारेची लढाई असल्याचे सांगितले.
सत्ताधारी धर्माचा वापर करून काही श्रीमंतांसाठी लढत आहेत, तर इंडिया आघाडी देशातील गरीब आणि तरुणांसाठी लढत आहे. ही निवडणूक देशाचे भविष्य आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. संविधान टिकले तरच आरक्षण टिकेल.हुकूमशाहीत लोकांचा मतदानाचा हक्कही जपला जात नाही, भाजपचे लोक उमेदवारांना धमकावून उमेदवारी दाखल करू देत नाहीत, असा आरोपही खरगे यांनी केला. हैदराबादमध्ये भाजप उमेदवार मुस्लिम महिलांचा बुरखा काढण्याचा प्रयत्न करत आहे. बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांनाही धमकावले जात आहे. एवढे करूनही इंडिया आघाडी चौथ्या टप्प्यात भाजपच्या पुढे आहे. तर भाजप खूपच मागे आहे, असेही खरगे म्हणाले.
यूपीमध्ये इंडिया आघाडीला मिळतील ७९ जागा -अखिलेश यादव
दरम्यान, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ४ जूनला देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. ४ जून हा वृत्तपत्र स्वातंत्र्यदिनही असेल. भाजपला १४० जागाही जिंकता येणार नाहीत. त्यांचा रथ बुडाला आहे. भाजप आपल्याच नकारात्मक दृष्टिकोनात अडकली आहे. इंडिया आघाडीला उत्तर प्रदेशमध्ये ७९ जागा मिळणार आहेत. ४ जूनला शेतक-यांचे आणि बेरोजगार तरुणांचे सरकार स्थापन होईल, असे अखिलेश यादव म्हणाले.