छत्रपती संभाजानगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून (१७ सप्टेंबर) आमरण उपोषण करणार आहे. मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
तर छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री ताईंचे १४ दिवसांपासून उपोषण सुरु आहे, त्यांनीही उपोषण मागे घ्यावे यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री अब्दुल सत्तार देखील होते. ते म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागण्यांत सगे सोयरे आणि हैदराबाद गॅझेटची मागणी आहे. मनोज जरांगे आणि माझे चांगले संबंध आहेत. त्यांना विनंती की मुंबईत या, चांगला शेवट करू, १००% शेवट गोड होणार, असे केसरकर म्हणाले.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मराठवाड्यातील दोन्ही उपोषणकर्त्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती केली. गॅझेटचा मुद्दा कॉमन असून, त्यासाठी आंदोलन सुरू आहे. दोघांशी बोलून आंदोलनाविषयी बोलले जाणार असल्याचे केसरकर म्हणाले. कोर्टाने आरक्षणाला स्टे दिला नाही. १० % आरक्षण सुरु आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील किती तालुके या खाली येतात त्यापूर्ता इंडेक्सचा विचार करू. विशेष अधिवेशन बोलवले आहे. आचार संहिता लागू होणार आहे, त्यापूर्वी विशेष अधिवेशन घेऊ. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र कमिटी विचार करेल, असेही केसरकर म्हणाले.
मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरु आहे, त्यावर केसरकर म्हमाले की, दोन समाजात फूट करू नये, दोघांशी बोलून विचार करू. एकी राहायला हवी, असेच सरकारचे धोरण आहे.
उपोषण करणा-यांची सरकारला काळजी आहे म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पाठवले आहे ते तुमच्या समाजाचे आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की पद गेले तरी चालेल मात्र मुलांना नोकरी लावून देणार. तुमचे बहुतांश मुद्दे मान्य झाले असून उपोषण मागे घ्यावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घ्या असे केसरकर यांनी मनोज जरांगे आणि उपोषणकर्त्यांना आवाहन केले. मंत्री दीपक केसरकर यांच्याआधी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.