निलंगा : प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांची निलंगा शहरातील वृंदावन मंगल कार्यालयात दि १३ मार्च रोजी बुधवारी संवाद बैठक होणार आहे. या बैठकीस निलंगा तालुक्यातील व परिसरातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज निलंगा तालुक्याच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी महाराष्ट्र भर तीव्र लढा उभा केला आहे, अंतरवाली सराटी येथे त्यांनी आमरण उपोषण करून आपल्या मागण्या सरकार समोर ठेवल्या होत्या सरकारने मागण्या मान्य करू असा शब्द दिला होता तो शब्द सरकारने पाळला नाही, सगेसोयरे कायदा पारित करून मराठा समाजाला न्याय द्यावा ही मागणी अखंड मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे मात्र याबाबत शासनाकडून निर्णय झालेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील विविध ठिकाणी भेटी देऊन समाज बांधवांशी संवाद साधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यातील सकल मराठा बांधवांनी शासकीय विश्रामगृह निलंगा येथे व्यापक बैठक घेऊन या संवाद बैठकीचे नियोजन केले आहे. जरांगे पाटील यांचे सकाळी ११ वाजता निलंगा शहरात आगमन करणार आहे. शेकडो दुचाकी रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात येणार असून निलंगा शहरातील वृन्दावन मंगल कार्यालयात ही संवाद बैठक पार पडणार आहे.