लातूर : प्रतिनिधी
वरिष्ठ पदांवर कार्यरत अधिका-यांना त्यांच्या विभागाच्या कामगिरीचे श्रेय दिले जाते. मात्र, प्रशासनाच्या उतरंडीत तळाशी असलेल्या कर्मचा-यांच्या कर्तृत्वाची दखल सहसा घेतली जात नाही. त्याचे स्वतंत्रपणे मूल्यमापन होत नाही. असाच अनुभव महिला दिनानिमित्त आयोजित अनेक कार्यक्रमात येतो. नेमकी हीच बाब हेरून, विविध विभागात प्रत्यक्ष फिल्डवर काम करणा-या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘मान्विथा कर्मसिध्दी पुरस्कार वितरण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरातील स्वच्छता कर्मचारी, फायरमन ते ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणा-या आरोग्य सेविका, आशा कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणा-या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात रंगलेल्या या आगळ्यावेगळ्या कौतुक सोहळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक महिला दिनाचा कौतुक सोहळा केवळ शीर्षस्थ पदावर काम करणा-या महिलांपर्यंत मर्यादित राहू नये, प्रत्यक्ष फिल्डवर काम करणा-या महिलांच्या कार्याची दखल यानिमित्ताने घेतली जावी, ही संकल्पना घेवून यंदा जिल्हा प्रशासनाने मान्विथा कर्मसिद्धी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. साचेबद्ध स्वरुपाला फाटा देत, कोणतेही व्याख्यान, भाषण न देता संवादात्मक स्वरूपाचा हा कार्यक्रम सर्वांसाठी उत्साहवर्धक ठरला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांची विवेक सौताडेकर यांनी घेतलेली प्रकट मुलाखत आणि त्यामध्ये उपस्थित महिलांनी नोंदविलेला सहभाग हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
जिल्हाधिकारी पदावर काम करणारी महिला प्रशासकीय जबाबदारी आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडताना कोणत्या आव्हानांना सामोरे जाते, यामध्ये कुटुंबाची साथ कितपत मिळते, असे विविध प्रश्न विचारात या महिला कर्मचा-यांनी जिल्हाधिका-यांचा प्रशासकीय प्रवास आणि या प्रवासात आलेले अनुभव जाणून घेतले. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी आपल्या गेल्या सुमारे तीस वर्षातील प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा पट उलगडला. एक महिला म्हणून प्रशासकीय जबाबदा-या सांभाळताना पती, कुटुंबाचे सदैव पाठबळ मिळाले, असे सांगून प्रत्येक महिला अधिकारी व कर्मचारी यांनी संसार आणि नोकरीचा समतोल साधताना, आपल्या आवडी-निवडी जोपासण्यासाठीही वेळ काढावा, असे सांगितले. सोबतच जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मुलाखतीतून महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत काम करताना येणा-या अनुभवाविषयी, तसेच कौटुंबिक जबाबदा-यांमध्ये महिला आणि पुरुषांची भूमिका कशी असावी, याबाबत त्यांचे विचार जाणून घेतले.