नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शुक्रवारी निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना कडक सूचना दिल्या आहेत. जात, धर्म, भाषा आणि इतर अनेक मार्गांनी मते मागू नयेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या उमेदवार आणि स्टार प्रचारकांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही आयोगाने म्हटले.
जातीय भावनांच्या आधारावर अपील करू नये. विविध गटांमध्ये मतभेद वाढवणा-या किंवा शत्रुत्व वाढवणा-या कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये, मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने खोटी विधाने किंवा निराधार आरोपांचा प्रचार करू नये. वैयक्तिक हल्ले टाळले पाहिजेत आणि राजकीय भाषणात सभ्यता जपली पाहिजे. निवडणूक प्रचारासाठी मंदिर/मशीद/चर्च/गुरुद्वारा किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करू नये. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेविरुद्ध मानली जाणारी कोणतीही कृती किंवा विधाने टाळावी, असत्यापित आणि दिशाभूल करणा-या जाहिराती प्रसारमाध्यमांना देऊ नयेत. सोशल मीडियावर संयम ठेवावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे टाळा, अशा सूचना दिल्या आहेत.
प्रचारादरम्यान शिष्टाचार राखा
निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना निवडणूक प्रचारादरम्यान शिष्टाचार राखण्यास सांगितले आहे. स्टार प्रचारक आणि उमेदवार, विशेषत: ज्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांच्यावर अतिरिक्त लक्ष देण्यात येणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी वस्तुस्थिती नसलेली विधाने करू नयेत किंवा मतदारांची दिशाभूल करू नये, असे आयोगाने म्हटले आहे.