लातूर : सिद्धेश्वर दाताळ
हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरणपुरक ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी आणि जिल्ह्यातील बस सेवा वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या ई-बस सेवा योजना अंतर्गत देशातील १६९ शहरांना १० हजार ई-बसेस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप योजनेतून दिल्या जाणार आहेत. या योजनेमुळे आता लातूर जिल्ह्यात १०९ ई-बसेस लवकरच धावणार आहेत.
केंद्र सरकारने महत्त्वाची अशी ई-बस योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ५७ हजार ६१३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ई-बस सेवेमध्ये देशभरात सुमारे १० हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत या बसेस १० वर्षांसाठी चालवल्या जाणार आहेत. राज्यात केंद्र पुरस्कृत ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने शहराच्या लोकसंख्येनुसार यामध्ये ३ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये लातूर जिल्ह्याला १०९ नवीन ई-बससेस मिळणार आहेत. एप्रिल किंवा मे महिन्यात लातूर परिवहन महामंडाळाकडून जिल्हाभरात इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत.
यासाठीचा आवश्यक तो प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच लातूर परिवहन महामंडाळाकडून शासनाकडे पाठवला होता त्यावर शासनाने आता शिक्कामोर्तब केला आहे. त्या अनुषंगाने सध्या जिल्ह्यातील पाचही आगारांत चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच जिल्ह्यातील सर्व प्रवाशांना या बसेसचा लाभ मिळणार असल्याचे लातूर विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळकर यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात ई-बस सेवा सुरू झाल्यावर प्रवाशांना एसीचा प्रवास करता येणार आहे. एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना विविध सुविधा देण्यात येत असून त्या सर्व सुविधा ई-बससाठीही लागू राहणार आहेत.
लातूर जिल्ह्याला १०९ ई-बस मिळणार असून त्या बसेस तालूका आगारास सुधा मिळणार आहेत. त्यात लातूर आगरास ३० बसेस, उदगीर आगारास २४ बसेस, अहदपुर आगारास २४ बसेस, निलंगा आगारास १६ बसेस, औसा आगारास १५ अशा सर्व मिळुन जिल्ह्याभरात १०९ इलेक्टिक बस दाखल होणार आहेत. या बसेस ९ आणि १२ मीटर आकारात आहेत. ९ मीटर आकाराची बस ही दिवसाला २०० किलोमिटर तर १२ मीटर आकाराची बस ही दिवसाला ३०० किलोमिटर दावणार असल्याचे विभागीय अधिकारी यांनी सागीतले आहे.