सोलापूर : ‘डीजे’चा टेम्पो घेऊन विवाहस्थळी निघालेल्या टेम्पोच्या (एमएच १३, आर २०८५) धडकेत त्याच विवाहासाठी निघालेल्या बळीराम अभिमन्यू व्यवहारे (रा. कुर्डुवाडी, ता. माढा) यांच्या कारमधील (एमएच ४५, ए ३२५४) त्यांचा मुलगा उत्कर्ष (वय ९) हा ठार झाला आहे.
दुसरा मुलगा संकल्प (वय १३) आणि बळीराम व्यवहारे यांची पत्नी चांदणी हे दोघे गंभीर जखमी आहेत.
कुर्डुवाडीत खासगी कोचिंग क्लासेस चालविणारे मूळचे नेवरे (ता. माळशिरस) येथील बळीराम व्यवहारे हे नातेवाईकाच्या विवाहासाठी कारमधून नेवरे गावी निघाले होते. त्यांच्यासोबत दोन मुले, पत्नी व भाचा गणेश अजित सावंत (वय १६) हा होता. बोरगाव-वेळापूर पालखी मार्गावरील सर्व्हिस रोडने गावाकडे जात असताना बोरगाव शिवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिजजवळ डीजे घेऊन निघालेल्या टेम्पोने व्यवहारे यांच्या कारला जोरात धडक दिली.
या अपघातात कारची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. या अपघातात गंभीर जखमी नऊ वर्षाचा उत्कर्ष जागीच मरण पावला. या प्रकरणी जखमी बळीराम व्यवहारे यांनी अकलूज पोलिसांत फिर्याद दिली असून टेम्पो चालक समीर अन्वर शेख (वय ३५, रा. वेळापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार मनोज बागडे तपास करीत आहेत.
फिर्यादी कार चालविणारे बळीराम व्यवहारे यांची पत्नी चांदणी व भाचा गणेश हे दोघे मागच्या सीटवर बसले होते. समोरील सीटवर उत्कर्ष आणि संकल्प हे दोघे बसले होते. अपघातानंतर चालकाच्या डाव्या बाजूला जोरात धडक बसली. त्यानंतर कारच्या दोन्ही एअर बॅगा उघडल्या, पण दोन्ही चिमुकली कारच्या डॅशबोर्डवर जोरात आदळली. त्यात नऊ वर्षाच्या उत्कर्षला कोठेही जखम झाली नाही, पण त्याच्या डोक्याला आतून जखम झाली आणि त्याच्या कानातून, नाकातून खूप रक्त येऊ लागले. त्यातच त्याने जागीच जीव सोडला. संकल्पवर टेंभूर्णीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.