उत्तर काश्मिरात राफेलच्या घिरट्या, लष्करप्रमुखांनी घेतला नियंत्रण रेषेचा आढावा
काही तरी मोठे घडणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. या पार्श्वभूमीवर भारताचे तिन्ही सैन्यदल हायअलर्टवर आहे. अचानक काही घडलेच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे वायूदल, भूदल, नौदल सज्ज झाले. दरम्यान, उत्तर काश्मीरमध्ये रात्रीपासून राफेल विमान घिरट्या घालत आहे. राजस्थान बॉर्डरवरील बीएसएफ फौजांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच लष्कर प्रमुखांकडून नियंत्रण रेषेचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे काही तरी मोठे घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय सेनेकडून युद्धासाठीची रणनीती आणि शस्त्राभ्यास याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पाकिस्ताजवळील एलओसीवर सर्वात पुढे भारतीय भूदलाचे सैनिक असतात. पहलगाम घटनेनंतर भूदल अलर्ट मोडवर गेले आहे. भूदलाने राजस्थानमध्ये वेगवेगळ््या ठिकाणी युद्धाभ्यास केला आहे. भारतीय सेनेने याला नियमित युद्धाभ्यास असल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांनी तयारी केली आहे.
भारतीय भूदलातर्फे व्हिक्टर फोर्स, राष्ट्रीय रायफल्स, पॅरा स्पेशल पोर्स यूनिटसला दक्षिण काश्मीर आणि एलओसीच्या आसपास तैनात करण्यात आले आहे. तसेच मोस्ट फॉरवर्ड पोस्टवर टी-९० भीष्म टँक, स्पाईक यासारख्या अॅटी टँक गायडेड मिसाईल सिस्टिम्स, पिनाका मिसाईल सिस्टिम्स तैनात करण्यात आल्या आहेत. हेरोन तसेच स्वदेशी ड्रोनच्या माध्यमातून एलओसीच्या पलीकडे नेमके काय चालले आहे, यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. यासोबतच भारताची वायुसेनादेखील दक्ष झाली आहे. भारताचे सुखोई-३० एमकेआय, मिराज-२००० आणि राफेल विमान पंजाब, जम्मू आणि श्रीनगर एअरबेसवर तयार आहेत.
याशिवाय नौदलानेही पश्चिमी समुद्रावर आपली गस्त वाढवली आहे. अरबी समुद्रात मिसाईल विध्वसंक, फ्रिगेट्स यासारखी प्रमुख जहाजे गस्तीवर आहेत. आयएनएस विक्रांतला कारवार बेसवर तैनात करण्यात आले आहे. नौदलाकडे असणारे हेलिकॉप्टर्स, एअरक्राफ्ट्सही तयार ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानविरोधात काही तरी मोठे घडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.