23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रतेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेक-यांचेही कर्ज सरसकट माफ करा

तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेक-यांचेही कर्ज सरसकट माफ करा

काँग्रेसची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतक-यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत शेतक-यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून भाजपा-शिंदे सरकारनेही शेतक-यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, तेलंगणाच्या जनतेला काँग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच काँग्रेस सरकारने शेतक-यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकारने असाच निर्णय घेऊन दिलासा देणे आवश्यक आहे; परंतु महाराष्ट्रातील भाजपाप्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार दिसले आहे. विविध राज्यांत शेतक-यांच्या दुधाला ४५ रुपयापर्यंत भाव मिळत आहे; परंतु महाराष्ट्रातील शेतक-यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रती लिटर विकले जात आहे. राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतक-यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत अन्यथा शेतक-यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पटोले यांनी दिला.

पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात
नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. ज्या ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे त्या त्या राज्यात नीट पेपर फुटीचे कनेक्शन सापडले आहेत. केंद्रातील सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून नीट परीक्षाच रद्द करा, अशी काँग्रेसने मागणी केली होती. आता सीबीआय चौकशी सुरू झाली आहे; पण परीक्षा रद्द केलेली नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR