नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीत उष्णतेने कहर केला आहे. महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावली असली तरी दिल्लीकरांना अजूनही उकाड्यापासून दिलासा मिळालेला नाही. दिल्लीत उष्णतेने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. आता ही उष्णता जीवघेणी ठरू लागली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणा-या मृत्यूंनी पुन्हा एकदा दिल्लीतील स्मशानभूमीत कोरोनासारखी परिस्थिती उद्भवली आहे.
दरम्यान, दिल्लीत उष्णतेमुळे इतके मृत्यू झाले आहेत की स्मशानभूमीत अन्त्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिल्लीच्या महापालिकेच्या बोध घाटावर कोरोनानंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात इतके अन्त्यसंस्कार झाले आहेत. बुधवारी (१९ जून) रात्री १२ वाजेपर्यंत तब्बल १४२ मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यात आले आहेत. यापूर्वी, कोरोनाच्या काळात २२ एप्रिल २०२१ ला या घाटावर एका दिवसात २५३ मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यात आले होते.
बोध घाटाच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण उष्णता असू शकते. मात्र, बोध घाटावर अन्त्यसंस्कारासाठी येणा-या मृतदेहांच्या मृत्यूचे कारण नोंदवले जात नाही, त्यामुळे सगळ्यांचाच मृत्यू उष्णतेमुळे झाला असे म्हणता येणार नाही. यावर्षी जून महिन्यात दिल्लीतील महापालिकेच्या बोध घाटावर आतापर्यंत ११०१ मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यात आले आहेत. घाटावर मृतदेहांच्या अन्त्यसंस्कारासाठी कुटुंबीयांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे.