लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी हर्षवर्धन सपकाळ, राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या मान्यतेने नुकतीच लातूर जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या नूतन जिल्हा कार्यकारणीची पहिली विशेष बैठक गुरुवारी जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीस नूतन पदाधिका-यांची जवळपास शंभर टक्के उपस्थिती लाभली होती. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी काँग्रेस खंबीर असून शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, असे आवाहन अभय साळुंके यांनी यावेळी केले.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी पक्षाची आगामी दिशा व ध्येयधोरणे स्पष्ट केली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक शिबिरामधून मिळालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात बूथ, गाव आणि प्रभाग पातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम व आक्रमक केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या लातूर जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे. अशा संकटसमयी काँग्रेस पक्ष केवळ बघ्याची भूमिका न घेता शेतक-यांचा भाऊ आणि मित्र म्हणून खांद्याला खांदा लावून उभा राहील, प्रत्येक गावात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत, अशी ग्वाही साळुंके यांनी दिली. दुष्काळाच्या दाहकतेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी येत्या पाच दिवसांत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून प्रत्येक तहसील कार्यालयात नव्या मागण्यांचे निवेदन दिले जाईल. शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत प्रत्येक महसूल मंडळ, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल आणि सरकारला जाब विचारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीत प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. परवा मसलगा पाटी येथे दुष्काळी मदतीसाठी शांततेत रास्ता रोको करणा-या हवालदिल शेतक-यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या घटनेचा बैठकीत निषेध करण्यात आला. मदत मागणा-या बळीराजावर गुन्हे दाखल करणे हा अत्यंत तुघलकी निर्णय असून शासनाने हे सर्व गुन्हे तात्काळ व बिनशर्त मागे घ्यावेत, असा निषेधाचा ठराव या नूतन कार्यकारणी बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला. संकटग्रस्त बळीराजाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरूच राहील, असा निर्धार केला.
















