नाशिक : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी खुला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यादृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केल्याचे समजते.
एमएसआरडीसीने ७०१ कि.मी. लांबीचा आणि ५५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्चून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा संपूर्ण महामार्ग याआधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. दरम्यान, टप्प्याटप्प्याने आतापर्यंत ६२५ कि.मी. लांबीचा नागपूर-इगतपुरी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आता इगतपुरी-आमणे, भिवंडी या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे. इगतपुरी ते आमणे हा ७६ किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महाराष्ट्रदिनी खुला होणार असल्याची चर्चा आहे. ३५ मीटर रुंद आणि ६ लेन दुहेरी बोगद्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
इगतपुरी-आमणे-भिवंडी हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईकरांना केवळ आठ तासांत नागपूर गाठता येणार आहे. आता ही प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. शेवटच्या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून, आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे.