नवी दिल्ली : भारतातील सर्वांत मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट-यूजी २०२६’ ‘गेस पेपर’ फुटल्याच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली आहे. या घडामोडीने एकच खळबळ उडाली आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दल केंद्रीय यंत्रणांकडून चिंता व्यक्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाखो विद्यार्थी प्रभावित झाले असून, सरकारने आता हस्तक्षेप करत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी फेरपरीक्षेची घोषणा केली.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आरोपांच्या सखोल चौकशीसाठी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीए विभागाला पूर्ण सहकार्य करेल आणि चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, नोंदी आणि सहाय्य प्रदान करेल. कोणतीही नवीन नोंदणी आवश्यक असणार नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले शुल्क त्यांना परत केले जाणार आहे आणि एनटीएच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून परीक्षेचे पुनर्नियोजन केले जाईल. पुनर्नियोजित परीक्षेच्या तारखा आणि पुन्हा जारी केलेल्या प्रवेशपत्राच्या वेळापत्रकासह पुढील माहिती संस्थेच्या अधिकृत माध्यमांद्वारे दिली जाणार आहे.
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केला होता.
देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांनी यंदा ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात ४२ तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर
देशभरात गेल्याच आठवड्यात म्हणजेच ३ मे २०२६ रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. आता, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल, त्यासाठी परीक्षार्थींचे परीक्षा केंद्र ३ मे रोजीचेच राहणार असून विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी, पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
२८१ प्रश्न असलेल्या ॅ४ी२२ स्रंस्री१ मधील १३१ प्रश्न जसेच्या तसे ‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेत येत असतील तर २०२४ प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झाला हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार ‘एसआरपीएफ’ परीक्षेच्या संदर्भात झाला होता. ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणे योग्य नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी, ही विनंती, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार म्हणाले.
















