जळगाव : पुणे ते ब-हाणपूर-धारणी जाणारी खाजगी बस पिंपळगाव गोलाईत (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे बसने पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे. जामनेर- पहूर रस्त्यावर ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास मंगळवारी घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार एमपी ४८ झेडपी ५५३३ क्रमांकाची खाजगी बस पुण्याहून ब-हाणपूर ते धारणी जात होती. पहूर सोडल्यानंतर पिंपळगाव गोलाईत गावाच्या जवळ बसने अचानक पेट घेतला. ही बाब बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरड करून बस थांबवित सर्व प्रवासी बाहेर काढले.
यादरम्यान हवा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले आणि प्रवासी सुखरूप स्थळी हलवित असतानाच बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमध्ये जवळपास पंचवीस प्रवासी असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. मोठा अनर्थ याठिकाणी टळला आहे.