मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचे अलर्ट दिले आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत पारा तापणार असून तीन जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. पुढील दोन दिवसांत राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे जाईल असा अंदाज हवामानतज्ज्ञ एस. डी. सानप यांनी वर्तवला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पुढील सात दिवस तापमानाचा पारा हा दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-कोकण या किनारपट्टीच्या भागात ८ आणि ९ मार्च रोजी उष्ण आणि आर्द्र तापमानाची शक्यता आहे. तसा यलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
अमरावतीत सर्वाधिक तापमान
आज सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. ४०.८ अंश सेल्सिअस तापमान अमरावतीत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तापमान हे ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचा हाय अलर्ट दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात पुढील दोन दिवस पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वर्धा, अकोला आणि अमरावतीला पुढील दोन दिवसांसाठी उन्हाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा ५ अंश सेल्सिअसने जास्त राहील. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांत तापमान सामान्यपेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअस जास्त राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे . पुढील दोन दिवस विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांचे तापमान ३८ ते ४० अंश राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुण्यात उकाड्याने लाही लाही
पुण्यात आता चांगलाच उकाडा जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा दोन अंश जास्त तापमानाची नोंद झाली आहे . ३६ ते ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुणे शहरात होत आहे. येत्या काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस तापमान ४० अंशावर जाण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याचा पारा वाढला
मराठवाड्यातही गेल्या चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा हा ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. आज परभणी जिल्ह्यात ३८.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. धाराशिवमध्ये ३६.२. छत्रपती संभाजीनगर ३७,७ बीड ३६.६, उदगीर ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रात हळूहळू तापमानात वाढ होणार आहे.

