नगर : प्रतिनिधी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतही सत्ताधारी मित्रपक्ष सुद्धा एकेमकांवर टीका करत होते. महायुतीतील प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत आपण महायुतीत २० जागा लढविण्याबद्दल वक्तव्य केले असून सध्या राजकीय क्षेत्रात त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आमदार बच्च कडू हे महायुतीत असून सुद्धा त्यांनी अनेकदा सरकारमधील मंत्र्यांवर टीका केलेली दिसली. अशात आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.
बच्चू कडू म्हणाले, विधानसभा लढविण्या संदर्भात उद्या शुक्रवारी आमची मुंबईला मीटिंग आहे. २० ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावले आहे. सगळ्यांसोबत चर्चा करून व्यूहरचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडीसोबत कसे जाता येईल किंवा व्यक्तिगतरीत्या कसे लढता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत. महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये. युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणे गरजेचे आहे. आमची पार्टी आहे, आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
मंत्रिपद घेणार नाही
‘मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाहीत आणि दिलं तरी मी घेणार नाही. आलंच वाट्याला तर आमचे राजकुमार पटेल यांना देऊ. आदिवासी आमदार आहेत. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केले, राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ, फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेल. मी सगळं सांगेन.’ असे कडू यांनी म्हटले आहे.