लातूर : योगीराज पिसाळ
जसा-जसा पावसाळा जवळ येत आहे, तशा-तशा वृक्ष लागवडीच्या योजना कार्यन्वित होत आहेत. यावर्षी रोहयोच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला ४०० वृक्ष प्रमाणे ७८६ ग्रामपंचायतीत ३ लाख १४ हजार ४०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्ष्टि आहे. लागवड झालेल्या वृक्षांचे बिहार पॅटर्नप्रमाणे संगोपणही करण्याची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे या योजनेतून नागरीकांना रोजगार मिळण्याच्या बरोबरच वृक्षांचे संगोपणही होण्यास मदत होणार आहे.
हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. पाऊस चांगला झाल्यास वृक्ष लागवडीलाही गती मिळणार आहे. लातूर जिल्हयात आगामी कालावधीत १ कोटी ४० लाख ५८ हजार २०० वृक्षांची लागवड होणार आहे. त्यापैकी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला एक काम २०० रोपे प्रमाणे दोन कामे मिळणार असून एका ग्रामपंचायतीला २ कामे दिली जाणार असून ४०० रोपे लागवड करणे अपेक्षीत आहे. जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये रोहयोच्या माध्यमातून ३ लाख १४ हजार ४०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
ग्रामपपंचायतीमध्ये लागवड होणा-या वृक्षांची बिहार पॅटर्न प्रमाणे जोपासणा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून झाडांना पाणी व संरक्षण देण्यासाठी गावातील नागरीकांच्या कुटूंबाला गावातच रोजगार मिळणार आहे. त्यामुळे नागरीकांना गावातच रोजगार मिळून वृक्षांचे संगोपण होणार असल्याने वृक्ष जिवंत राहण्याचे प्रमाण वाढणार आहे.