भिवंडी : पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरी असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना भिवंडी शहरातील फेणे गाव येथे घडली असून आज सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाल भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (वय ३२) व मुली नंदिनी (वय १२),नेहा (वय ०७) व अनू (वय ०४) यांसोबत राहत होता. लालजी शुक्रवारी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. आज सकाळी नऊच्या सुमारास तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेक वेळा दरवाजा वाजवूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने पती लालजी याने छोट्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर पत्नीसह मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर भिवंडी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, महिला अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली आहे.
दरम्यान, मुलींना गळफास लावून नंतर स्वत: जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय महिलेने कोणत्या कारणामुळे घेतला, याबाबतचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून केला जात आहे.