गिलगीट : वृत्तसंस्था
पुलवामा हल्ल्यावेळी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची लाँच पॅड उध्वस्त केली होती. तशीच कारवाई आता होणार या भीतीने तेथील मदरसे, मशिदींमध्ये वास्तव्यास असलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे गिलगिट बाल्टिस्तानमधील मशिदी ओस पडल्या आहेत.
तीन दिवसांत या ठिकाणांवर राहत असलेले दहशतवादी हटविण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवाद्यांची उरलेली जमिनही आता उध्वस्त केली जाणार असल्याची धमकी मोदी यांनी दिली आहे. यामुळे दहशतवाद्यांमध्येच आता दहशत निर्माण झाली आहे. पाकिस्तानी नागरिकांना पाणी मिळणार नसल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार आहे.
भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल म्हणून पाकिस्तानी सैन्य गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तैनात केले जात आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून दहशतवाद्यांचे म्होरके देखील पळाले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचा-यांच्याही सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. पीओके भारत ताब्यात घेण्यासाठी कारवाई करेल असेही पाकिस्तानला वाटत आहे. यामुळे तिथे युद्ध भडकू शकते, या शक्यतेने तेथील कर्मचा-यांना, हॉस्पिटलना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे.
भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याची डेडलाईन आज संपली आहे. यामुळे सीमेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रत्येकाची कागदपत्रे पाहून पाकिस्तानच्या गेटवर जाऊ दिले जात आहे. जे मागे राहतील त्यांचा शोध घेऊन त्यांनाही पाकिस्तान सीमेवर सोडले जाणार आहे. देशात संतापाची लाट आहे. बदल्याची भावना तीव्र आहे. २२ एप्रिलला धर्म विचारून पर्यटकांना लक्ष्य केले गेले आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे, त्यांची घरे पाडली जात आहेत.