मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी मंडळी काहीही दावे करीत असली तरी सत्तेत आल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाची फसवणूक केली जात आहे. दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासला जात आहे. ही मंडळी सत्तेत येण्यात लाडक्या बहिणींचा मोठा हातभार होता, परंतु सत्ता मिळताच या मंडळींनी लाडक्या बहिणींनाच ‘हात’ दाखवायला सुरुवात केली. असे म्हणत माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आपले काम करून घेवून महायुती सरकार आता सर्व योजना बंद करण्याचा सपाटा लावत आहे.
एक रुपयात पीक विमा योजनाही रद्द करण्यात आली. बळिराजाशी संबंधित इतरही अनेक योजना बंद केल्या गेल्या. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी यांसह इतरही अनेक बाबतीत विद्यमान सरकारचे ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचे उद्योग सुरू आहेत.
नवनवीन नियम आणि निकष यांचा बागुलबुवा उभा केला. पात्रतेची चाळणी बारीक केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडक्या’ ठरलेल्या लाखो बहिणी सत्ता स्थापन झाल्यावर ‘लाडक्या’ राहिल्या नाहीत. त्यांना अपात्र ठरविले गेले. पाठोपाठ केशरी आणि पिवळे रेशनकार्डधारक वगळता इतर अर्जांची पडताळणी केली जाईल, असे फर्मानच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्र्यांनी काढले, अशी घणाघाती टीका केली.
आता ७ लाख ७४ हजार लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी फक्त ५०० रुपयेच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कारण काय, तर म्हणे या महिला ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चाही लाभ घेत आहेत. जे लाडक्या बहिणींचे तेच सामान्य शेतक-यांचे. ‘शेतक-यांना कर्जमाफी देऊ म्हणजे देऊच,’ असे जाहीर आश्वासन राज्यकर्त्यांनी दिले होते, मात्र लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक बोजाचे कारण देत शेतक-यांना आता तरी कर्जमाफी देणे शक्य नाही, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हात झटकल्याचे उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.
एक रुपयात पीक विमा योजनाही रद्द करण्यात आली. बळिराजाशी संबंधित इतरही अनेक योजना बंद केल्या गेल्या. लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी यांसह इतरही अनेक बाबतीत विद्यमान सरकारचे ‘वरातीमागून घोडे’ नाचविण्याचे उद्योग सुरू आहेत. नवीन नियम आणि निकषांची ही ‘घोडी’ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात कुठे पेंड खात होती? याच घोड्यांवरून सत्ताधारी सध्या स्वत:ला मिरवत आहेत आणि लाडक्या बहिणींपासून शेतक-यांपर्यंत सर्वांची फसवणूक करीत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
हेराफेरी करून सत्तेवर आलेल्या राज्यातील विद्यमान सरकारचे फसवाफसवी आणि लुटीचे कारनामे रोजच चव्हाट्यावर येत आहेत.
मुळात हे सरकार हाच एक घोटाळा
आता जालना जिल्ह्यातील एक भयंकर प्रकार उघड झाला आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांच्या सानुग्रह अनुदानाच्या कोट्यवधी रुपयांवर तेथील तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. मुख्य म्हणजे हा सुमारे ५० कोटींचा अपहार झाल्याची कबुली उपजिल्हाधिका-यांनीच दिली आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रात घोटाळेबाज आणि लुटारू राज्य करीत आहेत. मुळात हे सरकार हाच एक घोटाळा आहे. त्यामुळे फसवणूक, घोटाळे आणि लूट याशिवाय दुसरे काय घडणार? असा खोचक प्रश्नही ठाकरे यांनी केला आहे.