पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मान्सून साधारणपणे येत्या ५ ते ७ जून पर्यंत दाखल होईल असा अंदाज हवामान शास्त्राचे अभ्यासक संशोधक डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.
वेध पर्जन्याचा या विषयावर त्यांचे भाषण झाले त्यानंतर ते बोलत होते मराठवाडा विदर्भ,कोकण, मध्य महाराष्ट्र आदि भागात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असेल. विशेष म्हणजे राज्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहील असे असले तरीही ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या वतीने यावर्षी सरासरी १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात बदल होण्याची शक्यता नाही असे ते म्हणाले.
यावर्षी केरळमध्ये एक दिवस अगोदर मान्सून दाखल झाला आहे असे विचारता ते म्हणाले, अभ्यासावरुन मान्सून २८ मे रोजी केरळ मधे दाखल होईल असा अंदाज वर्तविला होता हा अंदाज बराचसा बरोबर ठरला आहे देशभरात देखील पावसाचे प्रमाण चांगले राहील विशेषत: उत्तर भारतात हे प्रमाण तुलनेने अधिक असेल असे ते म्हणाले. हा पाऊस खरीप आणि रब्बी पिकांच्या वाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे असे ते म्हणाले.
होळी आणि अक्षयतृतीयेच्या सणांचे महत्व लक्षात घेवून खगोलशास्त्राच्या आधाराने देखील हे अंदाज अचूकपणे लावता येऊ शकतात, असे डॉ . गायकैवारी यांनी सांगितले. यंदा भारतात सर्वत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार आहे, पाचव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहीर या गणितज्ञाने आपल्या बृहतसंहिता या प्राचीन ग्रंथात पर्जन्यमानाचे अंदाज खगोलशास्त्राच्या आधाराने अचूकपणे लावता येतील इतकी इत्यंभूत माहिती लिहून ठेवली आहे. त्यावर गेली सात वर्षे संशोधन, निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर पावसाचे प्रमाण वर्तवणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.