मुंबई : मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यभरातील अनेक भागांत महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे. ‘महिलांना खून करण्याची परवानगी द्यावी’, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, आज ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन. एकीकडे आजचा दिवस महिलांसाठी सन्मानाचा असला तरी दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचं काय असा सवाल उपस्थित केला जातो आहे. याच अनुषंगाने रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित सर्वांत प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो.
जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे. आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणा-या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय! विचार करा काय परिस्थिती असेल?
नुकताच वर्ल्ड पॉप्युलेशन रिव् ू सर्व्हे आला आहे, अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हेनुसार आशिया खंडात भारत सर्वांत असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे. त्यामुळे आम्हाला एक खून माफ करा, अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो. अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा आम्हाला खून करायचा आहे.
महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती. मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे. आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू.