लातूर : प्रतिनिधी
लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी असलेल्या मांजरा नदीवरील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून दररोज सरासरी ०.१४ दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. गेल्या १५ दिवसांत या प्रकल्पातून २ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्यााने प्रकल्पातील पाण्याचे जलदगतीने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे.
मांजरा प्रकल्पावर लातूर, धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांतील सुमारे २१ पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत. लातूर एमआयडीसी आणि लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या या मांजरा धरणात आजघडीला एकुण पाणीसाठा १११.८० दशलक्ष घनमीटर आहे. जीवंत पाणीसाठा ६४.६७ दशलक्ष घनमीटर आहे. जीवंत पाणीसाठ्याची टक्केवारी ३६.५५ एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मांजरा धरणात ब-यापैकी पाणीसाठा आहे. परंतू, गेल्या १५ दिवसांत पाढलेल्या तापमानाच्या पा-यामुळे मांजरा धरणातील पाण्याचे वेगात आणि मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. गतवर्षी दुष्काळ होता. त्यामुळे मांजरा धरणात कमी पाणीसाठा होता. परिणामी पाण्याचे बाष्पीभवनही कमी प्रमाणात झाले होते. या वर्षी मात्र धरणाचा पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. पाण्याने धरणाचे जेवढ्या मोठ्या प्रमाणात पात्र व्यापले जाते तेवढ्याच वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत असते.
एकुण लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्हा आणि दुष्काळ हे प्राक्तन ठरलेलेच आहे. जानेवारीपासूनच जिल्ह्याला पाणीच्या टंचाईने मगरमिठी मारली आहे. आता त्यात चा-याच्या चणणचीची भर पडली आहे. चारा-पाण्याअभावी उमदे पशुधन बाजराच्या वाटेला लागले आहेत. जनावरांची बेभाव विक्री होत आहे. यावर्षी मुळातच पावसाळा कमी झाल्याने पुन्हा एकदा टंचाईने लातूर जिल्हा होरपळणार, असे दिसून येत आहे. दर चार वर्षांनी लातूरकरांच्या नशिबी दुष्काळ ठरलेलाच आहे. जिल्ह्यात पावसाळ्यातही जेमतेम वाहणा-या मांजरा, तेरणा नद्यांवर धरणे आहेत. जिल्ह्यातील काही नद्या एप्रिलपुर्वीच कोरड्या पडल्या आहेत. तलावांनी तळ गाठला आहे. विहिरी आटून गेल्या आहेत. बोअर बंद पडले आहेत. जमिनीतील पाणीपातळी खोल गेली आहे.सहाशे फुट बोअ र घेऊनही पाणी लागत नाही, अशी परिस्थिती आहे.