मुंबई : प्रतिनिधी
माजी आमदार रमेश कुथे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. कुथे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटात प्रवेश केल्यावर रमेश कुथे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान जिव्हारी लागले आणि त्यामुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मला भाजपने बेवकूफ बनवल्याची घणाघाती टीकाही कुथे यांनी यावेळी केली. ते मीडियाशी संवाद साधत होते.
फेब्रुवारी २०२४ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला आले होते. आपल्याकडे येणा-यांची खूप मोठी लाईन आहे, असे त्यांनी मला सांगितले होते. १०० जण आपल्याकडे येतील आणि पाच जण जातील. त्याने आपल्याला फरक पडत नाही. त्याच दिवशी कळले की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवले, असे माजी आमदार रमेश कुथे म्हणाले.
कुथे यांचा राजकीय प्रवास
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. २०१९ मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षांनंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी केली आहे. रमेश कुथे हे १९९५ आणि १९९९ असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केले होते.