मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत. हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नये असे सांगत जान्हवी नामक विवाहित महिलेने आरोप मागे घेतले आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले.
जान्हवीने आरोप मागे घेताना हे आपले घरगुती प्रकरण असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असेही ती म्हणाली. जान्हवी म्हणाली की, संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते. सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप मी मागे घेते. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणावरून कुणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुलस्टॉप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये.
सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केले तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने केला. मी शिरसाट साहेबांचा सन्मान करते. त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी कधीही फोन केला नाही असे जान्हवी म्हणाली. हे प्रकरण मला संपवायचे आहे, मला यात गुंतून न पडता पुढे जायचे आहे असे जान्हवी म्हणाली.
सिद्धार्थ शिरसाटांवर या विवाहित महिलेकडून मानसिक, शारीरिक छळ, फसवणूक तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांत आणि या विवाहित महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध निर्माण झाले. चेम्बूर येथील फ्लॅटवर वारंवार दोघांमध्ये भेटी होत असत. १४ जानेवारी २०२२ रोजी सिद्धांत आणि आपले बौद्ध पद्धतीने लग्न झाल्याचा दावा या महिलेने केला होता. तसेच त्याचे पुरावे असल्याचा दावाही तिने केला होता.
लग्नानंतर सिद्धार्थच्या स्वभावात बदल झाला.सिद्धार्थकडून नंतर या महिलेचा जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याची माहिती या महिलेने दिली होती. या महिलेला चेम्बूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची जबरदस्ती केली आणि संभाजीनगरात येण्यास मज्जाव करण्यात आला.
सिद्धार्थचे आधीचे विवाह संबंध, इतर महिलांसोबतचे संबंध उघडकीस आल्यानंतर २० डिसेंबर २०२४ रोजी शाहूनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पण संजय शिरसाट यांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबले असल्याचा आरोप या महिलेने केला होता.