मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. दादर परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस होत आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. आज (शुक्रवार) सकाळपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. तसेच राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलडाणा, वाशिममध्ये यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, पुणे, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सून वेळेवर आल्यामुळे शेतक-यांनी कामाला सुरुवात केली आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. दादर परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस होत आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघर रायगड या ठिकाणी मुसळधार पाऊस पाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव परिसरात पाऊस पडत आहे.
रत्नागिरी, चिपळूणमध्ये पाऊस
कोकणात पाऊस सुरू आहे. रत्नागिरी अन् चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने १६ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पहिल्या पंधरवड्यात दीड हजार मि.मी. पावसाचा टप्पा पार झाला आहे. या पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
जळगावमध्ये मुसळधार पाऊस
जळगाव शहरामध्ये मान्सूनच्या दुस-या पावसात दाणादाण उडाली आहे. मान्सूनच्या दुस-या पावसाची जोरदार बॅटिंग शुक्रवारी झाली. या मुसळधार पावसामुळे दुकानदारांसह नागरिकांची तारांबळ उडाली.