लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण व कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आजवर झालेल्या आंदोलनांदरम्यान शासनाने वेळकाढूपणाची भूमिका घेतली. मात्र, मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणारे संभाव्य आंदोलन ही निर्णायक लढाई असून, त्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार रविवारी (दि.१३) लातूर येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. कुणबी प्रमाणपत्राबाबत निर्णायक शासन आदेश निघाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवास, वाहन व्यवस्था, समाजबांधवांची संख्या व इतर तयारीबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यातून किमान २०० वाहने १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे रवाना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील समाजबांधव जरांगे यांच्यासोबत जाण्यासाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्काम करणार आहेत. गावागावांतून नियोजन करण्यात येत असून जिल्ह्यासाठी एकसमान बॅनर, पुरेसा शिधा व स्वयंपाकाची व्यवस्था केली जाणार आहे. महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार आहेत.
शेतीतील नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलांचे शिक्षण व मुलींच्या विवाहाचा खर्च यामुळे समाज अडचणीत आहे. सन्मानाने जगण्यासाठी आरक्षण हाच समर्थ पर्याय असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. हैदराबाद गॅझेटची ंमलबजावणी करावी तसेच कुणबी प्रमाणपत्रासाठी कोल्हापूर, औंध, सातारा आदी गॅझेटिअरही तातडीने लागू करावेत, अशी मागणी करण्यात आली. कुणबी प्रमाणपत्राबाबत अधिकृत शासन आदेश मिळाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
















