इस्लामाबाद : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. तर, ४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. मात्र, पाकिस्तानमधील एका माजी मंर्त्याने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
वास्तविक पाहता भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतात कुणाचे सरकार येणार, पंतप्रधान मोदी यांचे सरकार राहणार की जाणार, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का, अशा अनेक गोष्टींकडे जगभरातील मिडिया आणि तेथील नेतेमंडळी बारीक लक्ष ठेवून आहेत. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानमधील फवाद चौधरी या माजी मंर्त्याने भारतातील निवडणुकीबाबत एक मोठे विधान केले आहे. या विधानामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत-पाकचे संबंध सुधारायला हवेत
फवाद चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा आधार घेत म्हटले आहे की, मला असे वाटते की, भारतीय मतदाराचा खरा फायदा पाकिस्तानशी संबंध सुधारण्यात आणि भारत विकसनशील देशाकडे वाटचाल करण्यातच आहे. आता हे सर्व तेव्हाच होऊ शकते जेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कट्टर विचारसरणीचा पराभव व्हायलाच हवा. आता त्यांना कोणी पराभूत करेल, मग ते राहुल गांधी असोत, केजरीवाल असोत किंवा ममता बॅनर्जी असोत, आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत, जो कट्टरतावाद्यांचा पराभव करेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे फवाद चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले.
भाजप द्वेष निर्माण करतोय
सध्याचे विद्यमान सरकार केवळ मुस्लिमांमध्ये द्वेषच निर्माण करत नाही, तर पाकिस्तानबाबतही द्वेष निर्माण करत आहे. अशा परिस्थितीत विचारधारेचा हा प्रकार पराभूत होण्याची वेळ आली आहे. भारतीय मतदार हा मूर्ख नाही, त्याला सर्व काही कळते, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच काश्मीरचे मुस्लिम बांधव असोत किंवा उर्वरित भारतातील असोत, त्यांना सध्या कट्टरतावादी विचारसरणीचा सामना करावा लागत आहे.