लातूर : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला सोमवार दि. १० जून रोजी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या मोठ्या पावसाने छोट्या व्यापा-यांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना विशेषत: दुचाकीचालकांची कसरत झाली. सोमवारी दुपारपर्यंत कडकडीत ऊन पडले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानूसार अचानक ढगांची गर्दी झाली. काही क्षणातच पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसाने झोडपले. अधुन-मधुन ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरुच होता. सायंकाळपर्यंत ऊन आणि लगेच काळ्याकुट ढगांची गर्दी व काही क्षणात जोरदार पावसाला सुरुवात हे निसर्गाचे अनोखे चित्र शहरवासियांना अनुभवायला मिळाले. साधारणत: दोन तास पाऊस सुरु होता.
यामुळे शहरातील सर्वच रस्ते, नाल्या पाण्याखाली गेल्या. वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांना कसरत करावी लागली. हा पाऊस सुरु असतानाच विजांचा कडकडाटही सुरुच होता. दरम्यान लातूर तालुक्यातील बाभळगाव, बोरी, सलगरा, बोकनगाव, भडी, भातांगळी आदी गांवामध्येही जोरदार पाऊस पडला. आठ दिवसांपासून लातूर जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. जिल्ह्यात कुठे ना कुठे पावसाची हजेरी आहेच. साधारणत: ६ जूनपासून जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी जिल्हाभरात दमदार पाऊस पडला होता. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे.
दरम्यान या पावसामुळे खरीप पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. वाफसा झाल्यानंरत या आठवड्यात पेरण्यांना सुरुवात होणार आहेत. पेरणीसाठी शेतक-यांनी बी-बियाणे, खतांची तजवीज करुन ठेवली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज आहे.