Homeआरोग्यवाढत्या ‘स्क्रीन टाईम’चा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम

वाढत्या ‘स्क्रीन टाईम’चा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम

मुंबई : प्रतिनिधी
मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर जास्त वेळ घालवणा-या मुलांमध्ये दिवसेंदिवस स्वभावातील आक्रमकपणा, चिडचिड, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव दिसून येतो आणि वर्तणुकीतील समस्यांमध्येही वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. शारीरिक हालचालींचा अभाव आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर हे यामागील प्रमुख घटक आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वाढता स्क्रीन टाईम थेट मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. डिजिटल कंटेंट मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ सतत सक्रिय ठेवतो, ज्यामुळे डोपामाईनचे प्रमाण वाढते आणि मुलांना सतत उत्तेजनाची सवय लागते. दर महिन्याला ४ ते १४ वयोगटातील सुमारे ८ ते १० मुलांमध्ये आक्रमकपणा, चिडचिड होणे, झोपेच्या तक्रारी, एकाग्रतेचा अभाव आणि एकाकीपणा अशा समस्या उद्भवत आहेत.
वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलांची त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता कमी होते. संवाद कमी झाल्याने भाषेच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. तसेच, सायबरबुलिंग किंवा चुकीच्या ऑनलाईन कंटेंटमुळे मुलांच्या आत्मविश्वासावर त्याचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे आणि कुटुंबातील तणाव वाढू शकतो. मात्र, वेळीच उपचार केल्यास मुलांच्या वर्तणुकीत सुधारणा शक्य आहे. जाणून घ्या पॅरेंटिंग टिप्स –

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
२ वर्षांवरील मुलांचा स्क्रीन टाईम दिवसाला दोन तासांपर्यंत मर्यादित ठेवावा, दररोज किमान ४५ मिनिटे मैदानी खेळ किंवा व्यायामाला प्रोत्साहन द्यावे, जेवताना तसेच झोपण्यापूर्वी खोलीत मोबाईलचा वापर टाळा, मुलांशी नियमित संवाद साधून त्यांच्या भावना समजून घ्या, गरज असल्यास समुपदेशन किंवा वर्तणुकीसंबंधित उपचार घ्या.

पालकांकडून मानसिक आधार गरजेचा
मुलांच्या वर्तणुकीत बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. स्क्रीनचा मर्यादित वापर, सक्रिय जीवनशैली आणि पालकांकडून मानसिक आधार मिळाल्यास मुलांचे मानसिक आणि शैक्षणिक आरोग्य सुरक्षित राहते. वाढत्या स्क्रीन टाईममुळे मुलं आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागतात, अभ्यासात मागे पडतात आणि गॅझेट्स हातातून काढून घेतल्यावर संताप व्यक्त करतात. दर महिन्याला ४ ते ५ मुले ही एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी, कल्पनाशक्तीचा अभाव आणि कुटुंबीयांशी कमी संवाद अशा तक्रारींसह येतात. यामुळे वेळीच पालकांनी लक्ष द्यावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR