मुंबई : प्रतिनिधी
विशाळगडावर रविवारी झालेल्या तोडफोडप्रकरणी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांचे निलंबन करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ज्यावेळी जमाव स्थानिकांचे नुकसान करत होता, नासधूस आणि तोडफोड करत होता, त्यावेळी पोलिस अधीक्षक हे गाडीत बसून केवळ पाहत होते. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असे म्हणत विशाळगडावरील दंगल शासन पुरस्कृत होती काय? असा सवालही त्यांनी विचारला.
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी गडावर गेलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी गडावरील अतिक्रमणांसह गजापूर आणि अन्यत्र असलेल्या घरांची तोडफोड, जाळपोळ केली. या प्रकरणी सोमवारी ४०० हून अधिक अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून, २१ जणांना अटक करण्यात आली. मंगळवारीही पोलिसांकडून अटकेच्या कारवाईचे काम सुरू होते. या प्रकरणातील रवींद्र पडवळ व त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके पुण्याला रवाना झाली आहेत. दरम्यान, या विशाळगडावरील स्थानिकांच्या नासधूसप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेऊन सरकारला धारेवर धरले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, विशाळगडावर काही नालायक लोक हैदोस घालणार याची माहिती गुप्तचर विभागाकडे होती. सरकारडे माहिती असताना त्यांनी कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु सरकारने बघ्याची भूमिका घेतली. विशाळगडावर काही नालायक लोक हैदोस घालत होते, त्यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक गाडीत बसून सौम्य लाठीचार्जचा आदेश देत होते, असे सांगत विशाळगडावरील दंगल शासन पुरस्कृत होती काय? असा सवालही त्यांनी विचारला.