पुणे : प्रतिनिधी
मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत ती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, नणंद करिष्मा, दीर सुशील या सर्वांना अटक करण्यात आली आहे. तरीही या प्रकरणातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. याच दरम्यान काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचे सांत्वन करत वैष्णवीची आत्महत्या नसून हत्याच झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी वैष्णवी हगवने हिचे आई- वडील आणि कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दांत मांडता येण्यासारख्या नाहीत.
वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की, ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे. इतकी गंभीर घटना घडून सुद्धा पोलीस कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे अत्यंत दु:खद आहे. राज्य महिला आयोगाने स्वत:हून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिच्या ९ महिन्याच्या बाळाला आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा ही सरकारकडे मागणी आहे. असही त्यांनी म्हटलं आहे.
तर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार
दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आरोपी असलेला सासरा राजेंद्र हगवणे याला २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. नियमांचा अभ्यास करून, गरज भासल्यास आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचाही विचार केला जाईल.