33 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeमहाराष्ट्रवैष्णवीचे प्रकरण सीआयडीकडे सोपवा

वैष्णवीचे प्रकरण सीआयडीकडे सोपवा

रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पण या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते असलेले राजेंद्र हगवणेचा मुलगा शशांक याची ती बायको. पण लग्नाच्या काही महिन्यांत वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ करण्यास सुरुवात झाली. पण सासरच्यांकडून होणारा छळ अस झाल्याने वैष्णवीने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे पुरोगामी म्हटल्या जाणा-या महाराष्ट्रात आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ केला जातो, याबाबतची सत्यता समोर आली. त्यामुळे आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे, अशी महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिचे आई-वडील पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले. तेव्हा दीड दिवस तिची मृत्यूबाबतची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर देखील जे कलम लावण्यात आले, ते कलम सौम्य प्रकारचे होते, असा आरोप खडसेंनी केला आहे.

तसेच, वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच हे उघड झाले होते की, तिच्या अंगावर २९ ठिकाणी जखमा आहेत. हे प्रथमदर्शनीच्या अहवालामध्ये देखील नमूद आहे की, तिच्या अंगावर २९ ठिकाणी जखमा आहेत. तिला क्रूरपणे मारहाण झाली आहे. हे तिच्या शरीरावरील जखमा बघताना दिसत आहे. कुठेतरी आरोपींना मदत होईल, अशा पद्धतीने एफआरआय नोंदवली गेली होती का? की ज्या एफआरआयचा आज आरोपी असलेल्या लोकांना मदत होते आहे आणि त्याच एफआरआयच्या आधारावरती आरोपींचे वकील हे वैष्णवीच्या चारित्र्यहननापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. कारण एफआरआय नोंदवताना राहिलेल्या त्रुटी हे त्याचे कारण असल्याचे प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR