सोलापूर: मागील तीन-चार दिवसांपासून पुष्य नक्षत्राचा पाऊस जिल्हाभर सुरू आहे. त्याचा फटका सोलापूर शहरातील रस्त्यांनाही बसला आहे. शहरातील प्रमुख सत्यांसह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना जिकिरीचे होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरुन सोलापूर शहरात संभाजी महाराज चौकात आगमन होते. त्याठिकाणीच बाहेरहून येणाऱ्या प्रवाशांचे खड्ड्यांनी स्वागत होते. छत्रपतं संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे तो खड्डा ओळखू येत नाही. त्याचा फटका दुचाकीचालकांना बसत आहे. त्या खड्ड्यांमध्ये गेल्यास दुचाकीस्वार त्यावरुन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. पण सोलापुरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत खड्डयांतूनच होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याकडे महापालिकेने लक्ष देऊन शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातही महाराजांच्या पुतळ्यापुढे मोठा खड्डा पडला आहे.या खड्ड्यात दुचाकी जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातही रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. जेलरोड परिसरातील रस्त्यांची वाट लागली आहे. या भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षीच पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अतिशय बिकट होते. रस्त्यांवर असलेल्या खड्डयांमध्ये पाणी साचल्यामुळे ते ओळखू येत नाहीत. त्यामुळे अनेकठिकाणी अपघात घडत आहेत.याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
मागील जवळपास २० ते ३० वर्षांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला एवढा मोठा पाऊस कधीही झाला नव्हता. यंदा मोठा पऊस झाल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मोठ्या पावसामध्ये सुस्थितीत राहतील अशा रस्त्यांची निर्मिती होण्याची अपेक्षा सोलापूरकरांची आहे.सोलापूर एस.टी. स्टैंड ते एस. टी. डेपो यादरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून एस.टी. जात असताना प्रवाशांची हाडे खिळखिळी होत आहेत. मात्र, या रस्त्याकडे कुणाचेही लक्ष नाही.