मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुगीचा हंगाम अजून दूर आहे. तीन-चार महिन्यांनी या निवडणुकांचा फड रंगणार आहे. पण त्यापर्ू्वीच राज्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्रिकरणाची हलगी वाजली आहे. दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा जोमात असतानाच तिकडे शिंदे सेनेतील एका जुन्या जाणत्या शिलेदाराने बॉम्ब टाकला आहे. त्यांनी शिंदे सेना ही भाजपप्रणीत असल्याचा दावा केल्याने शिंदे सेनेपेक्षा भाजपा अधिक अडचणीत आली आहे. उद्या असाच दावा जर राष्ट्रवादीतूनही आला तर नवल वाटायला नको.
दरम्यान, शिवसेनेचा आश्वासक चेहरा असलेले गजानन कीर्तिकर यांनी शिवसेना फुटीनंतर शिंदे गट जवळ केला. पण पुढे त्यांना शिंदे सेनेत जणू अज्ञातवास झाला. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून झालेले वादंग सर्वांना आठवतच असेल. आता गजानन कीर्तिकर यांनी राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेदरम्यान मन मोकळे केले. त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. शिंदे सेना ही भाजपप्रणीत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
सल बोलून दाखवली
अडीच वर्षे झाली एकनाथ शिंदेंकडे येऊन. एवढे भक्कम संघटनात्मक काम केले. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केले. २० वर्षे आमदार, १० वर्षे खासदार, मंत्री पाच वर्षे एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही, याची खंत माझ्या मनात आहे, असे कीर्तिकर म्हणाले.
आता हवी एकच शिवसेना
शिवसेनेच्या मतात विभाजन होतं आणि शिवसेनेचं नुकसान होतं. हे कोणीही सांगेल. सध्या जे आहे हे त्रिभाजन आहे. दोन बंधू एकत्र आल्यावर त्यांचा तरी जनाधार त्यांना मिळेल. एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत लढायचं आहे, कारण शिंदेंची शिवसेना भाजपप्रणीत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसप्रणीत आहे. भाजपप्रणीत किंवा काँग्रेसप्रणीत शिवसेनाच्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना प्रमाण आहे, असे मत कीर्तिकर यांनी व्यक्त केले.
मतांचा गठ्ठा वाढवण्याची ताकद राज ठाकरेंकडे
निवडणुकीचे तंत्र वेगळे आहे. जिंकून येण्यासाठी मतं लागतात. पण मतांचा गठ्ठा वाढवण्यासाठीही काही नेतृत्व लागते. मतांचा गठ्ठा वाढवण्याची ताकद राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यांच्या भाषणामुळे उमेदवार निवडून येत नसतील. पण मतपरिवर्तन करण्याची ताकद राज ठाकरेंकडे आहे. उद्धव ठाकरेंकडे आहेच आहे, असे मोठे वक्तव्य कीर्तिकर यांनी केले.