पुणे : राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित ‘युवा संघर्ष निर्धार परिषदे’च्या निमित्ताने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. रविवारी (दि. २०) होणा-या या परिषदेत हे तीन नेते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी सदर परिषदेविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही परिषद आयोजित केली आहे. युवा अवस्थेत जानकर यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे राज्यात एक नवी चळवळ उभी राहिली. तसेच हे तीनही नेते सर्वसामान्य कुटुंबातील असून, ते परिषदेत युवकांना संदेश देतील. या परिषदेत अनिल पवार, विक्रम ढोणे, दत्तकुमार खंडागळे, सौरभ हटकर, नितीन आंधळे यांचा संघर्ष युवा योद्धा म्हणून सत्कार केला जाणार असल्याचे शेवते यांनी नमूद केले.
विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. सध्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून कोणत्याही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देखील देण्यात आलेले नाही. त्यामुळे कुठेतरी विरोधकांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात असतानाच विरोधकांची कमी झालेली स्पेस घेण्यासाठी महाराष्ट्रातील 3 मातब्बर नेते एकत्रित येणार आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये महायुती, महाविकास आघाडीनंतर वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रातील राजकारणात पाहायला मिळाला.
नवीन समीकरणाबाबत उत्सुकता
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत परिवर्तन महाशक्ती आघाडीचा प्रयोग देखील पाहायला मिळाला. अशातच आता लोकसभा आणि विधानसभेनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवीन आघाडीचा प्रयोग पाहायला मिळणार आहे. ‘खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार!’ या टॅगलाईनखाली ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक वेगळं समीकरण महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.