जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यातील उमरदरा येथील शेतकरी प्रल्हाद कोंडामंगले यांच्यावर म्हशीच्या साह्याने शेतीची मशागत करण्याची वेळ आली आहे. यासाठी बैल आवश्यक आहेत बैल नसतील तर ट्रॅक्टरद्वारे अंतर मशागत केली जाते मात्र बैल घेणे परवडत नसल्यामुळे शेतकरी प्रल्हाद कोंडामंगले यांना चक्क आंतरमशागतीसाठी म्हशींचा वापर करण्याची वेळ आली आहे .
शेत पिकत नाही उत्पन्न घटले आहे. बैल घेऊ शकत नाही. बैल जोडीचीकिंमत १ लाख ते दिड लाखापर्यंत आहे. मालाला भाव नाही अशा परिस्थितीत सदरील शेतकरी स्वत:च्या घरच्या म्हशीचा वापर शेती कामासाठी करीत आहेत .शेतीमधील कोळपणी तसेच वखरणी अधिक कामे या म्हशीपासून करीत असतात. खरे तर म्हशीला दुभते जनावर म्हणून ओळखले जाते.
दुधासाठी म्हशी पाळल्या जातात परंतु शेतक-यांची स्थिती हालाखीची होत असल्यामुळे शेतक-यांंना दुभत्या जनावरास औताला जुंपावे लागत आहे. जळकोट तालुक्यामध्ये दुष्काळ असतानाही शेतक-यांंना पिक विमा मिळाला नाही आणि दुष्काळी अनुदानही मिळाले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतक-यांंची आर्थिक परिस्थिती हालाखीची होत असल्यामुळे यातूनच शेतकरी आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होत आहेत. याकडे शासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शेतीच्या कामासाठी म्हशींचा वापर करावा लागत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी प्रल्हाद शिवाजी कोंडामंगले यांनी दिली.