मुंबई : प्रतिनिधी
भाजप आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यापूर्वी केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआला १८ किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा केली होती. सध्या त्यांचा हा व्हीडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून आता विरोधी पक्षाने आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे. आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करणार? असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
दरम्यान, लोकसभेत महाराष्ट्रात ४५ च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणा-या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने ३० जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारुण पराभव झाला.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलार यांना ट्वीट करत लिहिले की, आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा ना म्हणजे तुमच्या संन्यास सोहळ्याला मला तुम्हाला भगवी कफनी, रुद्राक्षाच्या माळा, काठी, लोटी, सगळं देता येईल.. ! अशी खोचक टीका करत अंधारे यांनी शेलार यांना टोला लगावला.