24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरसाडेपाच लाख मतांचा टप्पा पार करणारा उमेदवार ठरणार खासदार

साडेपाच लाख मतांचा टप्पा पार करणारा उमेदवार ठरणार खासदार

लातूर : विनोद उगिले
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीची प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. सर्वत्र अंदाज व्यक्त करण्याबरोबरच आकडेमोडही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याप्रमाणेच लातूर मतदारसंघातही आकडेमोड करून अंदाज व्यक्त केले जात आहेत. ही आकडेमोड पाहता विशेष म्हणजे अद्यापपर्यंत एकदाही चार लाख मतांचा टप्पा पार करू न शकलेली काँग्रेस या निवडणुकीत ओसरलेली मोदी लाट व बदललेल्या राजकीय घडामोडी, मराठा आरक्षणाचा प्रश्न यामुळे काँगेस या निवडणुकीत साडेपाच लाख मतांचा आकडा सहज पार करेल असे भाकितही राजकीय जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा तसेच या मतदारसंघाचे सलग सात वेळा नेतृत्व करणारे व विविध पदे भूषविणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याबरोबरच या मतदारसंघातील तत्कालीन मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर मतदारसंघाची वेगळीच ओळख महाराष्ट्र राज्याबरोबरच संपूर्ण देशात आहे. हे जरी खरे असले तरी या मतदारसंघात एकदाही चार लाख मतांचा आकडा काँग्रेस पक्षाला पार करता आलेला नाही. मोदीच काय तर कोणत्याही लाटेचा या मतदारसंघातील या काँग्रेसच्या मतावर परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

१९७७ साली काँग्रेसचे उमेदवार पी. जी. पाटील यांंना १ लाख ७० हजार १६४ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी विजयी ठरलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार यू. एस. पाटील यांना १ लाख ७८ हजार ८१५ मते मिळाली होती तर १९८० साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ५३ हजार ९४८ मते मिळाली होती. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना लाखाचाही आकडा पार करता आलेला नव्हता. १९८४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ८१ हजार ४६६ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस एस. चे उमेदवार पद्मसिंह पाटील यांना २ लाख ३ हजार ९२९ मते मिळाली होती. १९८९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. बापुसाहेब काळदाते यांना २ लाख ६० हजार ८७८ मते मिळाली होती.

१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ३७ हजार ८५३ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना १ लाख ७९ हजार १३५ मते मिळाली होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील यांना २ लाख ७९ हजार ७७५ मते मिळाली होती तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना २ लाख ४०३ मते तर जनता दलाचे उमेदवार बापुसाहेब काळदाते यांना १ लाख ६८ हजार ७२५ मते मिळाली होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना २ लाख ७९ हजार ७७५ तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना २ लाखांवर मते मिळाली. १९९९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख १४ हजार २१३ तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार गोपाळराव पाटील यांना २ लाख ७३ हजार १२३ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाशा पटेल यांना १ लाख ५५ हजार ८१६ तर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी ठरलेल्या भाजपाच्या उमेदवार रूपाताई पाटील यांनी ४ लाख ४ हजार ५०० मते तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार शिवराज पाटील चाकूरकर यांना ३ लाख ७३ हजार ६०९ मते मिळाली होती.

२००९ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत परत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला होता, या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव आवळे यांना ३ लाख ७२ हजार ८९० मते मिळाली होती तर भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांना ३ लाख ६४ हजार ९१५ मते मिळाली होती. २०१४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात इतिहास घडवत भाजपाचे उमेदवार सुनील गायकवाड यांनी ६ लाख १९ हजार ५०९ मते मिळवत मोठा विजय संपादन केला होता तर या निवडणुकीतील विशेष म्हणजे ज्या लाटेमुळे काँग्रेसला ६० वर्षांची सत्ता सोडावी लागली होती. या मोदी लाटेतही मतदारसंघात काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत मिळालेल्या मताच्या तुलनेतच ३ लाख ६३ हजार ११४ मते मिळाली होती हे विशेष आहे. यानंतरच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना ६ लाख ६१ हजार ४९५ मते मिळाली होती तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७२ हजार ३८४ मते मिळाली होती. यावरून काँग्रेसचे पावणेचार लाख मतदान लातूर लोकसभा मतदारसंघात कायम असल्याचे स्पष्ट होते.

असे असतानाच मतदान पार पडलेल्या २०२४ च्या निवडणुकीत मात्र चित्र वेगळे पहायला मिळेल असे भाकित व्यक्त केले जात असून राज्यात सत्तेसाठी झालेल्या राजकीय घडामोडी, महागाई, सत्ताधा-यांविरोधातील रोष, मराठा आरक्षण, भाजपातील गटबाजी, ओसरलेली मोदी लाट, मराठा आरक्षण व देशमुख कुटुंबीयांनी या निवडणुकीत घेतलेली मेहनत, उपस्थित केलेले स्थानिक मुद्दे व डॉ. शिवाजी काळगे यांना दिलेली उमेदवारी यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जडच राहिले असून उद्याच्या निकालात काँग्रेस साडेपाच लाखांचा टप्पा पार करेल आणि काँग्रेसचा उमेदवार विजयी हाईल, असे भाकित राजकीय जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.

वंचित २० हजार मतांच्या आतच !
मागच्या निवडणुकीत मोठा गाजावाजा करत बहुजन वंचित आघाडीने उडी घेत राम गारकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांनी लाखांचा आकडा पार करत सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला होता. या मताच्या भरवशावर या २०२४ च्या निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीने नरसिंह उदगीरकर यांना मैदानात उतरविले खरे पण यावेळेस वंचित आघाडी उमेदवार हे २० हजार मतांच्या आतच मते मिळवतील असेही भाकित राजकीय जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR