लातूर : प्रतिनिधी
जून महिण्यात झालेल्या सर्वदूर पावसाने लातूर जिल्हयात गेल्या दोन आठवडयात शेतक-यांनी ९६.३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या ऊरकल्या असून सोयाबनचा सर्वाधिक पेरा ११० टक्के झाला आहे. यावर्षी वेळेपेक्षा लवकर पेरण्या झाल्याने खरीप हंगामातील पिकांची उगवनही चांगली झाली आहे. शेतक-यांनी या पिकांची एक कोळपणीची फेरीसुध्दा पूर्ण केली आहे. त्यामुळे या पिकांच्या वाढीसाठी जिल्हयात दमदार पावसाची नितांत गरज आहे.
हवामान विभागाच्या अनुमानानुसार यावर्षी पावसाचे आगमन लवकर होऊन खरीप हंगामातील पेरण्याही गतीमान झाल्या आहेत. लातूर जिल्हयात सरासरी ७९१.६० मिली मिटर पाऊस पडतो. तो जून महिण्याच्या सुरूवातीपासूनच कोसळत असल्यामुळे आज पर्यंत जिल्हयात २३९.४ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाच्यामुळे जमीनीत ओल खोलवर पसरल्याने खरीप हंगामाच्या ९६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्हयात सध्या पेरण्या अंतिम टप्यात आहेत.
जिल्हयात आजर्यंत ५ लाख ७७ हजार ४७७ हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आसून या मध्ये ४ लाख ७४ हजार ८८१ हेक्टरवर सोयाबीनचा सर्वाधीक पेरा झाला आहे. तसेच तूर ६७ हजार ७९१ हेक्टर, मूग ६ हजार ६१० हेक्टर, उडीद ५ हजार ७२६ हेक्टर, ज्वारी ३ हजार ५९७ हेक्टर, बाजरी १९६ हेक्टर, मका १ हजार ९७४ हेक्टर, भात ३६ हेक्टर, भुईमुग १४५ हेक्टर, तीळ १३७ हेक्टर, कारळे ५५ हेक्टर, सुर्यफूल १८ हेक्टर पेरणी झाली आहे. तर कापूस १६ हजार १५८ हेक्टरवर लागवड झाली आहे.