सोलापूर- व्यक्तीगत जीवनात साधना केल्याने अंतरंगात रामराज्याची स्थापना होईल; परंतु सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात रामराज्याची स्थापना होण्यासाठी आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याच्या जोडीला भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा. आपले विचार आणि वर्तन हे हिंदु संस्कृतीला पूरक असायला हवे. असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे यांनी या वेळी केले.
सोलापूर शहरातील सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालय आणि एमआयडीसी वसाहत येथील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तसेच अकलूज आणि बार्शी यांसह देशभरात ७१ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या वेळी महोत्सवात वक्ते म्हणून लाभलेले सोलापूर येथील अखिल भारत पद्मशाली पुरोहित संघमचे अध्यक्ष वेणुगोपाल जिल्ला पंतुलु आणि अक्कलकोट प्रज्ञापीठचे अध्यक्ष प्रसाद पंडित यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी प्रसाद पंडित म्हणाले, सोशल मिडिया वर वेळ घालवण्याऐवजी साधना करण्यासाठी वेळ द्या. साधना केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. प्रतिदिन कुलदेवतेची उपासना केल्याने दैनंदिन जीवनातील अडथळे दूर होण्यास प्रारंभ होतो. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कन्नड आणि बंगाली भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न झाले. या माध्यमांतून देशविदेशातील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.