परभणी : येथील कवी डॉ.केशव खटींग यांच्या सालोसाल संग्रहातील माय झाली सरपंच या कवितेची निवड सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने केली असून बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेला आहे.
परभणीचे कवी डॉ.खटींग हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात दारेफळ येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांचा सालोसाल हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. परभणी येथील शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे सचिव आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखेचे ते सदस्य आहेत. साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारही मिळाले आहेत.
जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यापूर्वी त्यांची पाऊसपोथी ही कविता बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली होती. आता सोलापूर विद्यापीठाने बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेची निवड केल्याबद्दल कवी डॉ.खटींग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.