29.1 C
Latur
Tuesday, June 10, 2025
Homeलातूरस्वच्छतेची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावीत

स्वच्छतेची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावीत

लातूर : प्रतिनिधी
येत्या ३० जूनपर्यंत लातूर शहरातील नाली काढणे व स्वच्छतेची कामे पूर्ण करावीत, शहरात पिवळया रंगाचा पाणी पुरवठयास जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी, शहरातील सिंग्नल व सीसीटीव्ही व्यवस्था अद्ययावत करुन घ्याव्यात, अशा सुचना संभाव्य धोका टाळण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेतला आणि सर्व प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
मे महिन्यातील  मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे लातूर शहरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ६ जून रोजी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन, स्वच्छता, रस्ते व नाल्यांची दुरुस्ती यासह अमृत योजनेतील कामे, पार्किंग व्यवस्था, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० फुटी पुतळ्याच्या उभारणीसह परिसर विकास, आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाच्या संदर्भाने आढावा घेतला.
या आढावा बैठकीस लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड.किरण जाधव, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.  पंजाबराव खानसोळे, मुख्य लेखापरीक्षक कांचन तावरे, मुख्य लेखा अधिकारी रावसाहेब कोलगणे, बांधकाम विभागाचे अभियंता नवनाथ केंद्रे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त शिंदे, विद्युत विभागप्रमुख जयंत ताकपिरे, नगर रचनाकार जमादार, मालमत्ता विभाग प्रमुख बावणे, रमाकांत पिडगे, कलीम शेख, गोसावी समाज प्रतिनिधी व्यंकटेश पुरी, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे लातूर शहरात नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागले त्या समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी ३० जूनपर्यंत सर्व नाली काढणे व स्वच्छतेची कामे पूर्ण करावीत. शहरात तब्बल ४५ दिवस पिवळ्या पाण्याचा पुरवठा झाला आहे, यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई करावी, भविष्यात असा दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी केल्या आहेत. यावेळी पूढे बोलतांना अमृत योजनेत भुयारी गटारीच्या संदर्भाने पहिल्या टप्प्यात  झालेली योजना त्वरित कार्यान्वित करावी. दुस-या टप्प्यातील योजनेचे काम वेळेत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, जेणेकरून  शहरातील अस्वच्छतेची समस्या दूर होणार आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी, आवश्यक त्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही यंत्रणा उभारून उपाययोजना कराव्यात, पार्किंग संदर्भातील नियम हे जनतेला त्रास होऊ नये म्हणून आहेत, त्यांना त्रास देण्यासाठी नाही याची जाणीव ठेवून संबंधित विभागाने काम करावे. लातूर शहरातील स्ट्रीट लाईट नियमित चालू बंद केली जाईल याची दक्षता घ्यावी, त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यावर घर तिथे पथदिवा अशी व्यवस्था उभारण्याचे प्रपोजल तयार करावे अशी सुचनाही त्यांनी केली.
शहरातील मुख्य रस्त्याला समांतरपणे उभारल्या जात असलेला विलासराव देशमुख मार्ग अद्यावत सोई सुविधांसह पथदर्शी प्रकल्प म्हणून आपण विकसित करत आहोत, या प्रकल्पाच्या उभारणीत कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता महापालिकेने काळजी घ्यावी. या प्रकल्पासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत. त्यासाठी आवश्यक तो पाठपूरावा केला जाईल. त्याचबरोबर लातूर शहरातील गाव भागातील रस्ते, नाली, पाणी आणि वीज पुरवठा या संदर्भात स्वतंत्र प्रकल्प तयार करावा, त्यासाठी विशेष निधी मंजूर करुन आणला जाईल असे आमदार अमित देशमुख यांनी सांगीतले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फुटी पुतळा उभारणी आणि परिसर विकास एकत्रित आराखडास गती द्यावी,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० फुटी पुतळ्याची उभारणी आणि या संपूर्ण परिसराच्या विकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्याच्या यापूर्वी सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे या कामाला गती द्यावी, त्याचबरोबर शहरातील सर्व ग्रीनबेल्टच्या ठिकाणी असलेल्या सुविधांचा आढावा घेऊन तेथे किमान स्वच्छतागृह, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी या सुविधा अनिवार्यपणे निर्माण कराव्यात अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत.
या बैठकीदरम्यान गोसावी समाज स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा विषय चर्चेला आला. गोसावी समाज प्रतिनिधी व्यंकटेश पुरी यांनी सिध्देश्वर मंदीर जवळील दोन स्मशानभुमीच्या मध्ये असलेली १० हजार स्क्वेअर फुट जागा या स्मशानभुमीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. सदरील ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास त्वरीत या मागणी संदर्भाने कार्यवाही करण्याची सुचनाही आमदार देशमुख यांनी केली. यशोदा चित्र मंदिर ते बालाजी मंदिर रस्त्याचे रुंदीकरण करावे, क्रीडा संकुलावर स्वच्छतेसह मूलभूत सुविधा पुरवाव्यात, गोसावी समाजासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी, बांधकाम परवान्याप्रमाणेच बांधकाम होते की, नाही हे तपासावे, गांधी मार्केट मधील भाजी मंडईची पुनर्बांधणी करावी. यासह विविध सूचना या बैठकीदरम्यान केल्या आहेत. बैठक संपल्यानंतर आठ दिवसात या सूचनांच्या संदर्भाने कार्य अहवाल तयार करून पाठवावा, असेही याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR