मुंबई : प्रतिनिधी
कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे
. यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन सुमारे ८० टक्क्यांनी घटले आहे. परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारात हापूसची आवक अत्यल्प होती. त्यामुळे दर चढे राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आंबा परवडत नव्हता. एप्रिल-मे हा हापूसचा मुख्य हंगाम मानला जातो. या कालावधीत उत्पादन आणि आवक वाढल्याने दर नियंत्रणात येतात. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपर्यंतही आवक कमीच होती.
बाजारात दररोज केवळ ८ ते १० हजार पेट्यांची आवक होत होती. १० एप्रिलनंतर आवक वाढेल, असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आता आवकेत हळूहळू वाढ होत आहे. गुरुवारी वाशी बाजारात हापूस आंब्याच्या सुमारे ८० हजार पेट्यांची आवक झाली, जी यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वाधिक आवक ठरली आहे. त्यामध्ये कोकणातील ५० हजार पेट्या तर इतर राज्यातील हापूसच्या ३० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यापा-यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आवक वाढल्याने घाऊक बाजारातील दरातही घट झाली आहे. यापूर्वी दोन ते पाच डझन कच्च्या आंब्याच्या पेट्यांचे दर २००० ते ५००० रुपयांदरम्यान होते. सध्या हे दर १५०० ते ४५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पिकलेल्या आंब्यांचे दर यापेक्षा अधिक आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदाची एकूण आवक कमी असली तरी सध्या वाढलेली आवक आणि घसरलेले दर यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

