26.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रहे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार

हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपुरातूल माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळा अहमदाबादमधील अदानी फाऊंडेशकडे देण्याचा अध्यादेश राज्य शिक्षण विभागाने काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. ‘राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्रद्रोही सरकार म्हणत, याचे उत्तर द्यावेच लागले’, असा इशाराही त्यांनी दिला आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करत राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.

महाराष्ट्रातील शाळांचे व्यवस्थापन सुद्धा आता गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे.. चाललंय तरी काय? सध्या महाराष्ट्र सरकार गुजरातच्या आणि अदानीच्या दावणीला बांधलेले आहे, असेच दिसतेय. पहिले महाराष्ट्रातील उद्योग-प्रकल्प गुजरातला पळवले, इथल्या संस्था तिकडे वळवल्या, मुंबईचं रिअल इस्टेट मार्केट अदानीच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र रचले गेले, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

तसेच, मुंबईतील एअर पोर्ट, एअर पोर्ट कॉलनी, धारावी, मुलुंड, देवनार, मिठागराच्या जागा, एमएसआरडीसी वांद्रे रेक्लेमेशन येथील जागा आपल्या मित्राच्या घशात घालण्याचे पाप या सरकारने केले. आता शाळाही देत आहेत, पुढे महापालिका आणि ग्रामपंचायतही गुजरातच्या अदानीच्या ताब्यात देतील. हे गुजरातवादी, मित्रजीवी सरकार महाराष्ट्र गिळू पाहत आहे. यांना हटवा. चंद्रपूरमधली शाळा चालवण्यासाठी महाराष्ट्रातील एकही संस्था नव्हती का? गुजरातच्या अदानींकडेच का दिली? याचे उत्तर या महाराष्ट्रद्रोही सरकारने द्यावे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR