नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. १० वर्षांपूर्वी देशात ५०० पेक्षा कमी स्टार्टअप्स होते, पण आज २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. भारतातील तरुणांचे लक्ष वास्तविक समस्या सोडवण्यावर आहे. आमचे तरुण नवोन्मेषक, ज्यांनी नवीन स्वप्ने पाहण्याचे धाडस दाखवले. मी त्या सर्वांचे खूप-खूप कौतुक करतो.
पंतप्रधानांनी हे विचार नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्टअप इंडिया मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात मांडले. स्टार्टअप इंडिया मोहीम १६ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधानांनी सुरू केली होती. ज्याचा उद्देश नावीन्य, उद्योजकता वाढवणे आणि गुंतवणुकीमुळे होणारी वाढ सक्षम करणे हा आहे. गेल्या दशकात देशभरात २ लाखांहून अधिक स्टार्टअप्सना मान्यता मिळाली आहे.
२०१६ मध्ये जेव्हा स्टार्टअप इंडिया सुरू झाले, तेव्हा केवळ ४०० च्या आसपास स्टार्टअप्स होते. आज या मोहिमेने एक विशाल रूप घेतले आहे आणि २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या स्टार्टअप्सच्या माध्यमातून आतापर्यंत २१ लाखांहून अधिक प्रत्यक्ष नोक-या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असा अंदाज आहे.
१० वर्षांत ६,३८५ स्टार्टअप्स बंद
ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यामुळे ४ युनिकॉर्न (ड्रीम ११, एमपीएल, गेम्सक्राफ्ट, गेम्स २४ इनटू ७) चा दर्जा हिरावून घेण्यात आला. डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव संजीव यांच्या मते, देशात गेल्या १० वर्षांत ६,३८५ स्टार्टअप्स बंद झाले आहेत. हे एकूण स्टार्टअप्सच्या केवळ ३ टक्के आहे. हा दर जगभरात सर्वात कमी आहे.

