वेबसाईट हँग, लाखो विद्यार्थी, पालकांना मनस्ताप
मुंबई : प्रतिनिधी
दहावीचा निकाल लागल्यानंतर आज २१ मे २०२५ पासून ११ वीची ऑनलाईन प्रवेश परीक्षा सुरू होणे अपेक्षित होते. आजपासून ११ वीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू होणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाची वेबसाईट बंद पडली असून, सरकारची वेबसाईट अंडर कन्स्ट्रक्शन असल्याचा संदेश या वेबसाईटवर येत आहे. पहिल्याच दिवशी ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फज्जा उडाल्याने प्रवेश घेण्यासाठी धावपळ करणा-या लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे.
११ वीच्या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरू होणार होती. आता रजिस्ट्रेशनसाठी प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, महाराष्ट्र शासनाची अकरावी प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट हँग झाली आहे. ही लिंक २८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता बंद होणार आहे, असे या बेवसाईटवर म्हटले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ एक आठवड्याचा वेळ आहे. अशात पहिल्याच दिवशी सरकारी वेबसाईट ठप्प झाली आहे. विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ दिलेला आहे. त्यातच वेबसाईट ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. पहिल्याच दिवशी वेबसाईट हँग झाल्याने राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
२० लाखांहून अधिक
जागांसाठी अर्ज येणार
विद्यार्थी किमान एक आणि जास्तीत जास्त १० कनिष्ठ महाविद्यालयांसाठी त्यांची पसंती देऊ शकतात. दहावी बोर्डानुसार यंदा महाराष्ट्र एफवायजेसी प्रवेशासाठी एकूण ९,२८१ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील २० लाखांहून अधिक जागांसाठी अर्ज येणार आहेत.