लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि. २९ फेबु्रवारी रोजी लातूर येथील हॉटेल ग्रँड सरोवर येथे राज्यातील पहिली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद पार पडली. जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूकदार व व्यावसायिक यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ९५ उद्योग घटकांसाठी १ हजार ३४० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक अविनाश कामतकर, ‘मैत्री’ कक्षाचे पद्माकर हजारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके, व्यवस्थापक गोपाळ पवार यांच्यासह उद्योजक, बँकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणे व नव उद्योजकांना आकर्षित करणे, जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र आणून लातूर जिल्हा हा विकासासाठी केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा जिल्हा गुंतवणूक परिषदेचा उद्देश आहे
या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात ९५ उद्योग स्थापन होणार असून यामध्ये सुमारे १ हजार ३४० कोटी रुपये गुंतवणूक होईल. तसेच यामधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात ३ हजार ७५८ रोजगार निर्माण होतील, असे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी प्रास्ताविकात सांगितले. जिल्हास्तरीय उद्योग परिषदेनिमित्त आयोजित प्रदर्शनीतील उद्योजकांच्या दालनांना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यांनी भेटील दिल्या. तसेच त्यांच्याकडून उद्योगाबाबत माहिती जाणून घेतली.