37.5 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्र२३२ प्रवाशांसह तिसरे विमान पोहोचले

२३२ प्रवाशांसह तिसरे विमान पोहोचले

आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेले तिसरे विशेष विमान २३२ प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्थासुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८०० पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

काल २ विशेष विमानांनी १८४ प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर आज तिसरे विशेष विमान २३२ प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही ३ विमाने मिळून ४१६ महाराष्ट्रातील पर्यटक परत आले तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे ८०० प्रवासी परत आले आहेत. याशिवाय सुमारे ६० ते ७० आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता; पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR